सोमवार, 1 सितंबर 2008

तो...


काल ऑफिसला निघण्याची घाई,
आणि तो आला...
तो असाच येतो अचानक,
आधी सांगून न येताच...


आल्या आल्या म्हणाला,
आज घरी थांब ना सखे...
मी मुद्दामहून वेळ काढून आलोय,
बोलू काही आपल्या मनातले...


माझ्याही मनातले ऐकायला कोण होते
मी ही थांबले....
घरची कामं आवरता आवरता,
अधुनमधून त्याच्याकडे आसूसून पाहत राहिले...


त्याच्या जवळ गेल्या गेल्याच,
त्याने भिजवून टाकलं मला आपल्या वर्षावात...
स्पर्श त्याचे गहिरे अंगभर,
झिरपत राहिले प्राणाप्राणात...


माझं सगळं ऐकून घेत,
दिवसभर तो माझ्या सोबत राहिला,
माझ्या खिडकीच्या आतबाहेर,
मनातल्या वादळांचे आकार घेत
आसमंतात धुवाँधार बरसत राहिला...

संध्याकाळी निघताना म्हणाला,
आता मला गेलंच पाहिजे...
तू ही आता सावर स्वतःला
तुझ्या डोळ्यांतल्या थेंबांवरच
तू इंद्रधनुष्य बांधलं पाहिजे..

जाताना आठवण म्हणून
स्वतःचे दोन थेंब ठेऊन गेला माझ्या डोळ्यात...
आसमंतात भरून रहिलेलं त्याचं अस्तित्व,
मग झिरपत राहिलं पानापानात....

3 टिप्‍पणियां:

रत्ना हिले ने कहा…

काव्या..माझ्या - Romantic Kavita Community

sundar mhnav vatat nahi hya kavitela.....

karan fkt sundar kinva apratim ya shabdat nahi basu shkat ti....


tarihi...khup sundar kavita aahe dear...!!

khup aavdali mala.....kinva as mahn khup javalchi vatli....

रत्ना हिले ने कहा…

adrija – Romantic Kavita Community

mastach.......ga......
agadi hridaysparshi...

myou ने कहा…

अशी कविता प्रेम, जीव तोडून प्रेम केल्या शिवाय येत नाही!

खूपच आर्त! खूप मनस्वी!