रविवार, 7 सितंबर 2008

मित्रा...तुझ्यासाठी



(ही कविता माझ्या एक मित्रासाठी ज्याने सध्या कविता लिहिणे सोडलंय त्याच्या कोमल भावनांचे फुलपाखरू सध्या पंख मिटून बसलंय.... पुन्हा एकदा तो नव्याने आभाळात झेप घेईल हीच आशा मनी बाळगून लिहिलेली ही कविता...)

---------------------------------------------------------------------------------------

भावनांच्या लाटा अदृश्य तरीही
कोसळतात त्यांच्यामुळे कधी
उभार मनाचे मनोरे....
बहरलेल्या एखाद्या बागेचे
गळून जातातही कधी
शब्दफुलांचे फुलोरे...

जरी गळून गेले फुलोरे तरी
अजुन सुगंध आहे बाकी...
भावनांच्या धुक्यातून वाट काढत बाहेर ये,
लक्ख प्रकाश घेऊन तुझी वाट पाहत
मित्रा तुझी जिंदगी आहे अजुन बाकी...

सोमवार, 1 सितंबर 2008

तो...


काल ऑफिसला निघण्याची घाई,
आणि तो आला...
तो असाच येतो अचानक,
आधी सांगून न येताच...


आल्या आल्या म्हणाला,
आज घरी थांब ना सखे...
मी मुद्दामहून वेळ काढून आलोय,
बोलू काही आपल्या मनातले...


माझ्याही मनातले ऐकायला कोण होते
मी ही थांबले....
घरची कामं आवरता आवरता,
अधुनमधून त्याच्याकडे आसूसून पाहत राहिले...


त्याच्या जवळ गेल्या गेल्याच,
त्याने भिजवून टाकलं मला आपल्या वर्षावात...
स्पर्श त्याचे गहिरे अंगभर,
झिरपत राहिले प्राणाप्राणात...


माझं सगळं ऐकून घेत,
दिवसभर तो माझ्या सोबत राहिला,
माझ्या खिडकीच्या आतबाहेर,
मनातल्या वादळांचे आकार घेत
आसमंतात धुवाँधार बरसत राहिला...

संध्याकाळी निघताना म्हणाला,
आता मला गेलंच पाहिजे...
तू ही आता सावर स्वतःला
तुझ्या डोळ्यांतल्या थेंबांवरच
तू इंद्रधनुष्य बांधलं पाहिजे..

जाताना आठवण म्हणून
स्वतःचे दोन थेंब ठेऊन गेला माझ्या डोळ्यात...
आसमंतात भरून रहिलेलं त्याचं अस्तित्व,
मग झिरपत राहिलं पानापानात....